आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता.त्याला एक सून होती. त्याला एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता.
सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाककरून ठेवीत असे. सासू-सासर्यांना वाढीत असे. उरलासुरला आपण खात असे.असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला.बाई बाई मला न्हावू घाल. माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही.तुला न्हावू कशाने घालू ? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल. थोडं शेंडीला लावून न्हावू घाल.जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हावू घालून जेऊ घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं.
असे चार शनिवार झाले. चौथ्या शनिवारी या मुलान तांदूळ मागून घेतले, जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरे झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकीनी घर भरले.
सासू-सासरे देवाहून आले. तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन आली. मामंजी सासुबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस ? तिन सर्व हकीगत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला न्हावू घाल, माखु घाल. बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हावू कशाने घालू ? माझ्यापुरतं घागरीत असेल थोडे शेंडीला लावून न्हावू घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून
तेलं काढलं. त्याला न्हावू घालून जेवू घातलं उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले जातेवेळी तांदूळ घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी मी दारात उभी राहिले.असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्याना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
कहाणी शनिवारची मारुतीची || Kahani || Devotional ||
