आटपाट नगर होत. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी मुगाळी वासरं होती.
एके दिवशी काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊं लागली.
सुनेला हाक मारली,
‘मुली मुली, इकडे ये,’
सून आली. ‘काय?’ म्हणून म्हणाली.
तशी म्हातारी म्हणाली. “मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव.” असे सांगितले. आपण निघून शेतावर गेली.
सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलं. चिरलं. सारं शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली.
दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूने देखिलं तो तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं, ‘हे काय?’ म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. ‘तुम्ही सांगितलं तसं केलं,’ म्हणाली.
सासू घाबरली. न समजता सुनेकडून चुकी घडली, म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली.
‘देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर. गाईंची वासरं जिवंत कर. असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन,” असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण देखिलं.
पुढे संध्याकाळी गाई आल्या. हंबरडे फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. ‘हिचा निश्चय ढळणार नाही’ असे देवाला वाटले. मग देवाने काय केलं?
गाईंची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गाईगोर्ह्यांची पूजा केली. स्वयंपाक जेवली. आनंदी झाली. असे तुम्ही आम्ही होऊं.
ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.
कहाणी वसुबारसेची || Kahani || Devotional ||
